Friday, January 28, 2011

सुधारणा

दारे-खिडक्या सताड उघड्या
बाहेर पडू देत नाहीत अदृश्य बेड्या
खिडकीतल्या आभाळात मळभ साठतयं…
मला फार एकटं वाटतयं…

:(

-स्वानंद

आकाशात बसलेली बोळकी आज्जीबाई
तिला म्हणावं करत जा थोडी साफसफाई…
झाडू फिरव आकाशात, बघ मळभ सरतंय…
आज्जीबाई आहे ना, मग कश्श्याला एकटं वाट्टंय?!!

-अनुज्ञा

म्हटलं मी आज्जीला “झाडू जरा मार”
“मला नाही वेळ” -म्हणे “कामे आहेत फार”
कुरकुरणार्‍या आज्जीशी हुज्जत कोण घालणार ?
एकटं वाटायचं ते एकटंच वाटत राहणार…

-स्वानंद

कुरकुरणाऱ्या आज्जीला दे लिम्लेटची गोळी…
काम जरा राहू देत, आधी शोध तिची कवळी…
गोष्ट सांग एखादी, म्हणावं, झाडू मग नंतर…
कुरकुरणारे आजी-नातू, दोघांत नाही अंतर!!

-अनु्ज्ञा

नेहमी का ‘मी’च चांगले वागायचे?
दुसर्‍याच्या मनासाठी स्वत:चे मारायचे
आजी नको, गोष्ट नको, नको कोणी कोणी
एकटचं इथे राहू दे मला वेड्यावाणी

-स्वानंद

ठीक आहे…
ठीक आहे तुला मुळी नको कोणी कोणी…
आता मीही धाडणार नाही शब्दांमागून गाणी…

-अनुज्ञा

कुणाला कशाला उगाच माझा त्रास?
माझाच मला लखलाभ तुरुंगवास…

-स्वानंद

नको नको करता प्रसविता…
ही घडतेच पुन्हा कविता…
रुसल्या कवीला कशास पुसता…
हसतो पडता, रडतो हसता…

-अनुज्ञा

हसणे रडणे पडणे झडणे । याला म्हणती येथे जगणे ।
असे झिजूनी वाया जाणे । गंजून जाण्या परि बरे ॥

-स्वानंद

कितीक पडले, कितीक झडले
मानवरूपी मूषक येथे
जगले नाही...जन्मून मेले
त्यांच्या सडल्या कलेवरांवर..
काळ हासुनी पुढे सरे..

ज्याच्या शब्दे धरणी पुलकित।
काळ ही ज्यास्तव झाला कुंठित।
ऐशा मनुजा विश्वचि अंकित।
मग कंटाळ्या समय नुरे॥

नेत्री ज्याच्या स्वप्ने जळती होऊनिया अंगार...
त्याच्या पुढती विरून जातो कंटाळा अंधार

-अनुज्ञा

मनात झरते आशा निर्मळ स्वर्गंगेची धार
उरी उपजती हिमालयाहून उंच बुलंद विचार
नव्या युगाची मशाल हाती मुखी नवा एल्गार
त्याच्या पुढती विरून जातो कंटाळा अंधार...

:)

-स्वानंद

या सुधारणावादाच्या मूळ कवयित्री इथे सापडतील….

http://anujnainmarathi.wordpress.com/

मनगुज.. मनाचं सुरेल अलगुज…